नांदेड/लोहा/माळाकोळी | दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव वाढविण्यासाठी यंदा कुस्ती, कृषी व पशुप्रदर्शन तसेच शंकरपट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला असून, कला परंपरेचे जतन व्हावे यासाठी कला महोत्सवातील कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.


माळेगाव येथे आमदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सांगितले की, तमाशा व लोकनाट्य मंडळांची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याने त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा व प्रोत्साहनपर मानधन दिले जावे. यात्रेत सर्वपक्षीय नेत्यांचा सन्मान व्हावा, तसेच सुविधा पुरविताना कोणतीही उणीव राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बक्षिसांत मोठी वाढ- यंदा कुस्ती, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या स्पर्धांसाठी सुमारे ५० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभाग: फळपिके व मसाला पिक स्पर्धेत गटात प्रथम ७,०००, द्वितीय ६,०००, तृतीय ५,००० रुपये व उत्तेजनार्थ बक्षिसे.


पशुसंवर्धन विभाग: लाल कंधारी ब्रिड चॅम्पियन (नर व मादी) प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये, देवणी (नर व मादी) प्रत्येकी ७१ हजार रुपये, लाल कंधारी (नर व मादी) प्रत्येकी ५१ हजार रुपये, या विभागासाठी एकूण ११ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कुस्ती स्पर्धा: प्रत्येक बक्षिसात १० हजारांची वाढ; प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये. लोकनाट्य मंडळे: प्रत्येकी ७१ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम. शंकरपट स्पर्धा: प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये.

सुविधा, स्वच्छता व सुरक्षितता – यात्रेदरम्यान येणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून, यात्रा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येईल. वीज व पाणीपुरवठा सुरळीत असून आमदार निधीतून दोन डीपी, २५ पोल व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून, तलाव फुटल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
याशिवाय, माळेगाव यात्रेसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेला २ कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर मंत्र्यांना यात्रेचे निमंत्रण देण्यात आल्याचेही आमदार चिखलीकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना यात्रेचे महत्त्व समजावे यासाठी जिल्हाभरातील शाळांच्या सहली आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यात्रेत सीसीटीव्ही व स्वच्छतेवर विशेष भर
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले असून तलाव परिसरात सहा जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच सहा फिरती व दहा दुरुस्त सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरव, उपविभागीय अधिकारी नरवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, डीआरडीए प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी.बी. गिरी यांच्यासह विविध खात्यांचे विभाग प्रमुख, मंदिर समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

