श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातून गेलेल्या धनोडा–कोठारी राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार जवळील वाघाई टेकडी परिसरात उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील तिघांपैकी दोघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार दि. २३ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.


वाघाई टेकडीजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीच्या ट्रक (क्रमांक एपी ३९ यूएक्स ६८७६) ला मोटरसायकल (क्रमांक एमएच २६ वायएफ ४२३८) ची मागून जोरदार धडक बसली. मोटर सायकलवर आसोली साईनगर येथील तरुण विठ्ठल राठोड (वय ३०), दहा वर्षीय अर्जुन विठ्ठल राठोड तसेच आंध्रप्रदेशातील अंदाजे ६५ वर्षीय वयोवृद्ध असे तिघे प्रवास करीत होते. हे तिघे आसोलीहून लसनवाडी येथे जात असताना हा अपघात घडला. अपघातात विठ्ठल राठोड व सोबत असलेले वयोवृद्ध यांना डोके, तोंड व छातीवर गंभीर मार लागल्याने दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दहा वर्षीय अर्जुन राठोड गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत व जखमींना माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश नागरगोजे यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले असून जखमी अर्जुनवर उपचार सुरू आहेत. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका चिंतेचा विषय ठरत आहे.



