Saturday, June 27

Agriculture Department : कृषी विभागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहभोजन व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड, विशेष प्रतिनिधी | कृषी विभागातून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान व स्नेहभोजन कार्यक्रम सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी वजिराबाद रोडवरील हॉटेल दुर्वांकुर, नांदेड येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना दिलीप अनगुलवार व प्रम्हानंद अनमोड यांनी मांडली होती. ५८ वर्षांची सेवा पूर्ण करून सुमारे ३३ वर्षे कृषी विभागात कार्यरत राहिल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकत्र आणून स्नेहभाव जपावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

सेवानिवृत्तीनंतर अनेक अधिकारी वैयक्तिक आयुष्यात व्यस्त होत असल्याने सहकाऱ्यांशी संपर्क कमी होतो. मात्र, इतकी वर्षे खांद्याला खांदा लावून काम केलेल्या सहकाऱ्यांशी पुन्हा संवाद साधावा, आठवणींना उजाळा द्यावा आणि स्नेहबंध दृढ करावेत, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सल्लागार, तंत्र अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच वर्ग–१ चे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कृषी विभागातील दिवंगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्व उपस्थित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा शाल, पुष्पहार व शेतकऱ्यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लिपिक संघटनेच्या नवनियुक्त अध्यक्ष सुनील कुराडे, उपाध्यक्ष शे. अब्दुल हक व विश्वंभर गोरडवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन वर्ष २०२६ साठी तयार करण्यात आलेल्या संघटनेच्या शुभेच्छा पत्रिकेचे विमोचन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात सर्वत्री गोंडेस्वार, माणिकराव चव्हाण, रामलिंग मुंढे, रणवीर काळदाते, पांडुरंग मोरे, महेशराजे, तपासकर, मंगणाढ, वाखरकर, आनंदराव गोरे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कृषी विभागात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी असा सन्मान व स्नेहभोजन कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नव्हता, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दिलीप अनगुलवार व प्रम्हानंद अनमोड यांचे सर्वांनी विशेष कौतुक केले. तसेच एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून दरमहा निधी जमा करून गरजू सहकाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत हसतमुखाने एकमेकांचा निरोप घेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!