हिमायतनगर,अनिल मादसवार | मागील दोन-चार दिवसांपासून हिमायतनगर शहरासह तालुका परिसरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर तसेच हळद पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, तालुक्यात अद्यापही अपेक्षित पाऊस न झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता कायम आहे.


यंदा मागील वर्षांच्या तुलनेत हिमायतनगर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे अद्यापही अनेक नदी-नाले, ओढे आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. परिणामी विहिरी तसेच बोअरवेलची पाणीपातळीही समाधानकारक वाढलेली नाही. सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम अडचणीत येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.


सोयाबीन आणि हळदीच्या क्षेत्रात वाढ
यंदा तालुक्यात सोयाबीन आणि हळदीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. या पिकांना वाढीच्या टप्प्यावर पुरेशा पावसाची गरज आहे. सध्या पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे पिके हिरवीगार झाली असून शेतशिवारात समाधानाचे चित्र दिसत आहे. वाऱ्यावर डोलणारी पिके पाहून शेतकऱ्यांना खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, आता केवळ रिमझिम पावसावर भागणार नसून मोठ्या पावसाची नितांत गरज आहे, असे शेतकरी सांगत आहेत. आगामी नक्षत्र बदलानंतर दमदार पाऊस पडेल आणि नदी-नाले, ओढे व जलसाठे भरून निघतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.



‘पाऊस पडू दे’ म्हणून देवदेवतांना साकडे
पिकांना भरपूर पाणी मिळावे, खरीप हंगाम समृद्ध व्हावा आणि मानवांसह मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शेतकरी, नागरिक, वारकरी व भाविकांकडून देवदेवतांना साकडे घातले जात आहे. यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावा आणि तालुक्यात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली जात आहे.

सध्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी पुढील काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून ‘रिमझिम नको, आता दमदार पाऊस हवा!’ अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
“म्हणावा तसा पाऊस न झाल्याने यंदा पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाअभावी फवारणी, खत, कीटकनाशके आणि इतर निविष्ठांवरील खर्च वाढला असून, उत्पादन घटले तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती आहे.” — शेतकरी

