बैलजोडीचे स्वप्न अपूर्ण; तरीही जिद्दीने पिकवले शेत!
कंधार | ‘शेती आमची पंढरी, आम्ही पंढरीचे वारकरी…’ या भावनेने जगणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे मन हेलावून टाकणारे वास्तव नांदेड जिल्ह्यात समोर आले आहे. बैलजोडी घेण्याची ऐपत नसल्याने कंधार तालुक्यातील बामणी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी बाबाराव शिराळे यांनी चक्क स्वतःच कोळप ओढत शेतीची मशागत केली. त्यांच्या पत्नीने कोळपणीचे काम करत पतीला साथ दिली.


नांदेड जिल्ह्यात सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी पिकांच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे मोठे संकट उभे आहे. बैलजोडी नसल्याने आधुनिक यंत्रसामग्री भाड्याने घेणेही परवडत नसलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या श्रमावर शेतीची मशागत करावी लागत आहे.


बामणी येथील बालाजी शिराळे यांच्या शेतात दिसलेले हे दृश्य अनेकांचे मन हेलावून गेले. शेतकरी स्वतः कोळप ओढत होता, तर त्यांची पत्नी हातात कोळप धरून पिकांमध्ये कोळपणी करत होती. रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांनी हे दृश्य पाहिले; मात्र, या कष्टकरी दाम्पत्याची व्यथा जाणून घेण्यासाठी कुणीही पुढे आले नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.



शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो; मात्र आज त्याच पोशिंद्यावर स्वतः बैलासारखी मेहनत करण्याची वेळ आली आहे. शेतीत काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाला मिळणारा भाव मात्र समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.

“शासनाने आम्हाला बैलजोडी उपलब्ध करून दिली, तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकू आणि आमचा संसार सुरळीत चालवू शकू,” अशी भावना शेतकरी बालाजी बाबाराव शिराळे यांनी व्यक्त केली. बैलजोडी नसल्याने स्वतःच कोळप ओढण्याची वेळ येणे, हे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे विदारक वास्तव आहे.
शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत, शेतीसाठी आवश्यक साधने आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल शासन कधी जाणणार? असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
