हिमायतनगर,अनिल मादसवार| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १८ जुलै रोजी पदवी वितरण समारंभ (Degree Distribution Ceremony) उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ८५ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स कॉलेज, नांदेडचे प्राध्यापक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. ए. टी. शिंदे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रो. एल. बी. डोंगरे, प्रा. एम. पी. गुंडाळे, प्रा. डॉ. जी. पी. दगडे, प्रा. डॉ. ए. ए. दिवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ ध्वजाच्या पथसंचलनाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभागप्रमुख प्रा. डॉ. के. बी. पाटील यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण १४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी ११५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा निकाल जवळपास ८० टक्के राहिल्याची माहिती त्यांनी दिली.




प्रमुख पाहुणे डॉ. ए. टी. शिंदे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, पदवी मिळाल्यानंतर शिक्षणाची वाटचाल थांबवू नये, असे आवाहन केले. बदलत्या काळानुसार आवश्यक कौशल्ये व ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आपल्या मार्गदर्शनातून विविध चढ-उतारांची उदाहरणे देत पदवीधर विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीत कोणत्या संधींचा उपयोग करून घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एकूण ८५ पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एन. भदरगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. व्ही. व्ही. कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पदवीधर विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
