हिमायतनगर| साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी व्यक्त केले. सरसम येथे दि. २४ ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती भव्य व दिव्य उत्साहात पार पडली.


जयन्ती निमित्ताने सकाळी ११ वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर ११ वाजता जाहीर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तमराव बाबळे, पंडितराव वाघमारे, सखारामजी वाघमारे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना उत्तमराव बाबळे म्हणाले की, “अण्णा भाऊ साठे हे फक्त शाहीर किंवा कथाकार नव्हते तर ते थोर स्वातंत्र्यसैनिकही होते. त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास विचारवंत व लेखकांनी करणे आवश्यक आहे.


”जयंतीचे औचित्य साधून सरसम येथील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संतोष मंत्री (नांदेड) व सुप्रसिद्ध गायिका मनिषा कांबळे (परभणी) यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष शाहीर सुभाष गुंडेकर, उपाध्यक्ष सुरेश गुंडेकर, पवनकुमार बनसोडे, संजय गुंडेकर, मारोती गुंडेकर आदींसह समाज बांधवानी परिश्रम घेतले.




