Implement rural development : ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

WhatsApp Image 2025 12 17 at 6.13.26 PM 1 Implement rural development : ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर| गावातील पाणीपुरवठा योजना, पाणंद रस्ते, अंगणवाडी व शाळा इमारती, स्मशानभूमी, घरकुल तसेच सौर ऊर्जेच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. ग्रामविकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासकीय यंत्रणांनी ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.

विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांतील निवडक गावांमधील नागरिकांशी ‘ई ग्रामसंवाद – एक दिवस’ उपक्रमांतर्गत ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधला. या वेळी अपर आयुक्त मंजुषा मिसकर, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहायक आयुक्त ज्ञानोबा मोकाटे उपस्थित होते. संवादात संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्री. पापळकर म्हणाले की, गावातील पाणीटंचाईच्या नियोजनात पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्काळ सोडवून त्यामध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, अंगणवाडी सुविधा तसेच प्रत्येक गावात सुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध असणे गरजेचे आहे. ज्या गावांमध्ये या सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने तातडीने पाठपुरावा करावा. गावात एकही कुटुंब बेघर राहणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

संवादादरम्यान बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नफरवाडी, परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील हादगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी तसेच लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील नागरिकांनी त्यांच्या गावांतील विविध समस्या मांडल्या. विभागीय आयुक्तांनी संबंधित प्रशासनाला या अडचणी तत्परतेने सोडवून त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांतील नागरिकांनी या संवादात सहभाग नोंदविला. दर पंधरवाड्याला प्रत्येक जिल्यायातून एक गाव निवडून तेथील नागरिकांशी थेट हा संवाद साधला जाणार आहे. या उपक्रमामुळे गावातील प्रश्न समजण्यास मदत होते. योजनांचाही आढावा प्रभावी ठरतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top