हिमायतनगर| गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. वारंगटाकळी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांना तडे गेले असून, एका शेतकऱ्याचे राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पावसामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून पावसाळ्यात कुटुंबांना इतरत्र आसरा घ्यावा लागत आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकरी केशव कदम यांचे घर रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे अचानक कोसळले. घरातील साहित्य पाण्याखाली गेले असून, कुटुंबीयांना तातडीने घराबाहेर पडावे लागल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.


वारंगटाकळी व परिसरातील अनेक कच्ची घरे पडझड झालेली असून काही घरांना तडे गेले आहेत. तरीही महसूल प्रशासनाने पंचनामे सुरू केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गावचे पोलीस पाटील अवधूत राव कदम, सरपंच दयाळ गिरीगिरी, सदस्य दत्ता पुपलवाड व ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली की, “प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.”



