श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। हरणाच्या बेंबित मनमोहक, सुगंधीत कस्तुरी असते मात्र तिचा सुगंध तिलाच घेता येत नाही. ‘खाकेत कळसा गावाला वळसा’ या म्हणीप्रमाणे सुगंधासाठी ती सारा जंगल पिंजून काढते असे सांगितले जाते. अशीच स्थिती दिसुन येत असुन मृगाच्या कस्तुरीचा सुगंध शेतकऱ्यांना घेता येईल काय? अशी चर्चा शेतकऱ्यामधून केली जात आहे.
निसर्गाच्या तीन ऋतूमध्ये आणि २७ नक्षत्रांच्या तुलनेत मृग नक्षत्र हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा नक्षत्र आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाला सुरुवात होत असून, याच नक्षत्रावरून शेतीची दिशा आणि दशा ठरत असते. आदिवासी बहुल उद्योगविरहित माहूर तालुक्यात ऐकमेव शेती केली जाते. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन यावर्षीच्या खरीप हंगामाला जोमाने सुरुवात करण्यात आली असून, रोहिणी नक्षत्राच्या अगोदरच शेतकऱ्यांची शेतीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली.
आहेत. ७ जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. मृग नक्षत्राचे अर्धेअधिक दिवस लोटुन गेले तरीही वरूण राजाची कृपा दिसून येत नाही. मागील वर्षी मृग नक्षत्राच्या अखेरीस मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावून, पेरते व्हा च्या कामाला लागला होता. मात्र यावर्षी मृग नक्षत्राची चाल कोरडीच दिसून येत असल्यामुळे सरते शेवटी आहे.
हा तालूका आदिवासी,बहुल म्हणून नावारुपास आहे येथे कोणतेही उद्योगधंदे नसल्यामुळे शेती हाच मुख्य व्यवसाय समजला जातो पैनगंगा नदिला लागून असलेल्या शेतकरीना सिंचन सुविधा असल्या तरी बहुतांश भाग निसर्गावर अवलंबून आहे. साहजिकच सामान्य शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा करावी लागणारच.
यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने दर्शविल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद मनाशी बाळगून पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली आहेत.शेतातील नागर,वखर, कल्टीवेटर, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शेतात शेणखत टाकणे,पालव्या तोडने,बी बियाणांची रासायनिक खताची जुळवाजुळव करणे, आदी शेतीपूर्व कामाला पूर्णविराम दिला आहे.
मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी जुलै महिण्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले नाही. तरीसुद्धा यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी चांगलीच कंबर कसली असून, मोठ्या उमेदिने तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
रोहिणी नक्षत्राची सांगता होताच ७ जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. मृग नक्षत्राचे वाहन कोल्हा असून, मृगाचा पाऊस गुणकारी असतो असे जाणकार सांगतात. मात्र मृग नक्षत्राचे अर्धेअधिक दिवस निघुन गेले तरी मात्र मृग नक्षत्राची चाल पावसाच्या दिशेने वळल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षी मृग नक्षत्राच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे मागील वर्षी पेरणीच्या कामाला गती मिळाली होती.
यावर्षी मृग नक्षत्र मायदेशी परतण्याच्या वाटेवर असून, शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूण राजाकडे लागल्या आहेत. मृगाच्या पहिल्या पावसाने मातीला सुगंध येऊन तो सगळीकडे दरवळत असतो. पाऊसरुपी मृगाच्या कस्तुरीचा सुगंध शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी शेतकऱ्यांनी वरून राजाकडे प्रार्थना करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.