हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या नाली बांधकामाला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार चर्चेत येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने तातडीने भगदाडावर मटेरियल टाकून थातूरमातूर दुरुस्ती करत बोगस कामावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केला आहे.


हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नालीचे काम गेल्या महिण्यापासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने आतापर्यंत तीन ते चार ठिकाणी नालीला भगदाड पडले असून, अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत. तर नालीच्या वरून टाकण्यात येत असलेले झाकण दोन ते अडीच इंचाचे केले जात असल्याने वारंवार भगदाड पडणे तडे जाणे असे प्रकार घडत आहेत.


यामुळे भविष्यात पहिल्याच पावसात पाण्याच्या प्रवाहामुळे ही नाली कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व विकासप्रेमी नागरिकांनी केली आहे.


दरम्यान, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या कामाकडे संबंधित विभागाचा अभियंता फिरकलाच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत शासन व जनतेच्या पैशावर डल्ला मारत असल्याची टीकाही होत आहे. नाली व रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने न झाल्यास ठेकेदाराविरोधात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.


मागील आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे वडगावकर यांनी या नाली बांधकामाबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर काही दिवस नालीचे बांधकाम बंद ठेवून पुन्हा बोगस पद्धतीने कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठेकेदार व संबंधित अभियंता सर्वसामान्य नागरिक तर सोडाच लोकप्रतिनिधीच्या आवाजाकडेही दुर्लक्ष करत असल्याने या प्रकाराकडे सत्ताधारी आमदार, खासदार यांनी तरी लक्ष देऊन हिमायतनगर शहरात होत असलेल्या नालीच्या विकास कामाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे आणि भविष्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळाव्यात अशी मागणी ही केली जात आहे

