हिमायतनगर| तालुक्यातील जंगल परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. महागाडी बि बियाणे आणून पेरणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून हरीण, रोही, यासह वानर जातीच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.


तालुक्यातील टाकाराळा बु., मानसिंग तांडा, दरेगाव, दरेगाव तांडा, वाई, वायवाडी, दाबदरी, पोटा तांडा, दुधड, वाळकेवाडी, कोतलवाडी, दरेसरसम, पवना, पवना तांडा, वाशी, एकघरी, या भागात चांगल्या प्रकारे जंगल अस्तित्वात आहे. या भागात शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीत, कापूस, ज्वारी, मूग उडीद, सोयाबीन या पिकांची पेरणी केली आहे. या वर्षी सुरूवातीपासून पिकांना पोषक पाऊस बरसत असल्याने पेरणी केलेल्या पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे.


काही ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असून, आजघडीला खरीपाच्या पेरणीतील पिकांची अवस्था बर्यापैकी आहे. परंतू या कोवळ्या कापूस, सोयाबीन, मूग या पिकांवर वन्य प्राणी आघात करीत आहेत. या भागात रोही, हरण, रानडुक्कर, वानरांची मोठी संख्या आहे. या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्याप्रमाणात असून, एका रात्रीत होत्याचे नव्ह्ते करीत असल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त बनला आहे. वन विभागाने तात्काळ लक्ष पुरवून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरीत आहे.



