Care and precautions : नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IMG 20250924 112918 Care and precautions : नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड| मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २,१९,२२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची पाणी पातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकांनी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

काय करावे: गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.

पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास क्र.(0२४६२) २३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे. प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

काय करू नये : पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. दूषित / उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव किरण अंबेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top