नागपूर| मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे, निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली व बचावकार्याबाबत निर्देश दिले.