नांदेड| अहिल्यानगर जिल्ह्य़ातील दलित महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न गावगुंडांनी केला असून या जातीयवादी कृत्याचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध करण्यात येत आहे.


अहिल्यानगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी या गावच्या सरपंच मीनाक्षीताई रामदास सकट ह्या धडाडीने पुढे होऊन गावाचा चांगला विकास करीत आहेत, हे गावातीलच कांही जातीयवादी गावगुंडांना देखवत नव्हते म्हणून त्यांनी सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला.

रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी मीनाक्षीताई सकट ह्या आपल्या वाहनातून जात असतांना रस्ता आडवून गावगुंडांनी पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिले, त्यातून आपल्या लेकरासह उडी मारुन मीनाक्षीताईंनी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचे वाहन जळून खाक झाले.


या बाबतीत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या जातीयवादी कृत्याचा जाहिर निषेध केला आहे. फरार असलेल्या सर्व गावगुंडांना तात्काळ अटक करुन त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याची कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


