नांदेड| अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य कमिटीच्या निर्णयानुसार व आवाहनानुसार राज्यभर सामाजिक न्याय जत्थ्याचे आयोजन करण्यात येत आहे. जमसं नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने बोधडी ता.किनवट येथे दि.२५ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सामाजिक न्याय फेरी काढून घोषणा देत जनजागृती करण्यात आली.बोधडी परिसरातील विविध गावातून आलेल्या महिलांनी जत्थ्याचे स्वागत केले.


प्रथम जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्री फुले,महात्मा जोतिबा फुले,लोकशाहीर कॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


सद्यस्थितीत देशात ढासळत चाललेला एकोपा आणि सामाजिक न्याय व समतेसाठी महामानवानी दिलेले योगदान या विषयावर प्रकाश टाकणारी भाषणे प्रमुख वक्त्यानी केली.तसेच सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन जमसंच्या वतीने राज्यभर जत्थे काढून करण्यात येत आहे. कॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत फेरी काढून जत्था काढण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. आणि त्याच ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जमसंच्या अध्यक्षा कॉ.लता गायकवाड आणि सचिव कॉ.सुनीता बोनगीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा कॉ.शैलिया आडे यांनी केले. यावेळी जिल्हा कमिटी पदाधिकारी कॉ.प्रयागबाई लोखंडे, कॉ.सुंदरबाई वाहुलकर, कॉ.अर्चना काळे यांची भाषणे झाली.

सामाजिक न्याय जत्था यशस्वी करण्यासाठी कॉ.विद्या कंधारे, लक्ष्मीबाई कदम, वनमाला जोंधळे,इंदुबाई डोंगरे, शमा बी पठाण, पदमीनबाई धाबे आदींनी प्रयत्न केले. सामाजिक न्याय जत्थ्यास कॉ. जनार्धन काळे, कॉ.आडेलू बोनगीर आणि संतोष जुयेकर आदींनी शुभेच्छा दिल्या. समारोप कॉ. सुनीता बोनगीर यांनी केला.