नांदेड अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि इसापूर धरणातून कोळी, तळणी, कयाधू व निमगाव कॅनालद्वारे तात्काळ पाणी सोडावे, अशी रोखठोक मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली.


पालकमंत्री मा. ना. अतुलजी सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत आमदार कदम कोहळीकर यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागातील गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यंदा प्रतिकूल पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


दरम्यान, शेतकऱ्यांकडे असलेली ऊस, केळी, हळद, कापूस आणि तूर यांसारखी उर्वरित पिके वाचविणे अत्यावश्यक आहे. या पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असून वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही, तर या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती आहे.




त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून इसापूर धरणातून संबंधित कॅनालद्वारे तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार कदम कोहळीकर यांनी केली. तसेच दुष्काळी परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
सोयाबीन गेले, आता उर्वरित पिके तरी वाचवा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून शासनाने कागदी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीकडे तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पाणी सोडण्याचा निर्णय जितका लवकर होईल, तितक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.
शेतकरी संकटात असताना प्रशासनाने विलंब न करता उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बैठकीत मांडली.

