नांदेड | लोहा तालुक्यातील सोनखेड-कळंबर रस्त्यालगतच्या शेतशिवारात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता रेशीम शेती, दुग्ध व्यवसाय यासह विविध पूरक व्यवसायांचा अवलंब करावा. शासनाच्या उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले.



यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी कासराळे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

