नांदेड, जिल्हा प्रतिनिधी| स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वटफळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातील ध्वजारोहण स्थळावर चिखल, साचलेले पाणी आणि घाणीचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा अस्वच्छ ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देणे तिरंग्याच्या सन्मानाला शोभणारे नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील (वटफळीकर) यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे १५ ऑगस्टपूर्वी ध्वजारोहण स्थळाची तातडीने स्वच्छता करून नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


दीपक पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षीदेखील ध्वजारोहणाच्या ठिकाणी घाण आणि चिखलाची समस्या होती. मात्र, त्यावर कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी यंदाही तीच परिस्थिती कायम असून ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.



याशिवाय ग्रामपंचायत हद्दीतील अनेक सार्वजनिक रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि चिखल झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करून स्वच्छता मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
“१५ ऑगस्टपूर्वी ध्वजारोहण स्थळाची स्वच्छता झाली नाही, तर घाणीच्या साम्राज्यात राष्ट्रध्वज फडकवू दिला जाणार नाही. तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील (वटफळीकर) यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, या इशाऱ्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि स्वच्छतेबाबत काय कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

