
नांदेड| महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेती किंवा पीक कर्जावरील दोन लाखांपर्यंतचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व बँका व वित्तीय संस्थांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.


सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक, पुणे यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार, शासन अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित विविध कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. यात अभिस्वीकृती पत्र, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, तारण/गहाणखत, हमीपत्र, प्रतिभूती बंधपत्र, तसेच गहाणाशी संबंधित सूचनापत्र किंवा घोषणापत्र यांचा समावेश आहे.

दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी लागू असलेली ही मुद्रांक शुल्क माफी शेतकऱ्यांच्या आर्थिक भारात मोठी घट करणारी ठरणार आहे. शासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.





