Wednesday, May 13

Congress : खरात प्रकरणात राजकीय पाठबळाचा संशय; काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई | नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. महिलांचे शोषण करणारा अशोक खरात हा महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’ असल्याचा घणाघात त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, अशोक खरातच्या विरोधात समोर आलेले प्रकार धक्कादायक असून सखोल चौकशी केल्यास आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, तसेच त्याच्या मागे कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी राज्य आहे. तरीही अंधश्रद्धेविरोधी कायदा असतानाही अशा भोंदूबाबांचे प्रकार सुरू राहणे चिंताजनक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, हेही त्यांनी नमूद केले.

महिला आयोगावर टीका करताना सपकाळ यांनी म्हटले की, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली, हे अत्यंत निषेधार्ह आहे. महिला शोषणाविरोधात काम करण्याऐवजी अशा कृतींमुळे भोंदू प्रवृत्तीला पाठबळ मिळते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी गांधी भवन येथे सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची भूमिका ठरविण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.

पुढे बोलताना सपकाळ यांनी सांगितले की, यापूर्वी नांदेड, देगलूर आणि कसबा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबतही पक्ष सकारात्मक असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाईल.

(ही बातमी राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर आधारित असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!