Ncp Youth Congress : नाफेड हरभरा खरेदी केंद्रांवरील शेतकऱ्यांची लूट थांबवा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा
हमालीसाठी पैसे घेऊ नका, ५० किलो ४३० ग्रॅमपेक्षा जास्त वजन देऊ नका; अन्यथा आंदोलनाचा इशारा

नांदेड| जिल्ह्यातील नाफेड हरभरा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होत असलेली लूट तात्काळ थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे यांनी केली आहे. तसेच केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून हमालीसाठी पैसे घेऊ नयेत आणि वजनही ५० किलो ४३० ग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


बालाजी पाटील शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी किमान कष्टाने पिकवलेल्या हरभऱ्याची विक्री करण्यासाठी नाफेड खरेदी केंद्रांवर येत असताना काही ठिकाणी त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

हमाली, सुतळी, पोत शिवणे, छापा मारणे तसेच माल शासनाच्या गोदामात नेण्याचा खर्च यासाठी शासनाकडून केंद्र चालकांना प्रति क्विंटल अनुदान दिले जाते. त्यामुळे या बाबींसाठी शेतकऱ्यांकडून वेगळे पैसे घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच शेतकऱ्यांनीही जागरूक राहून ५० किलो ४३० ग्रॅमपेक्षा जास्त वजन देऊ नये आणि हमालीसाठी एकही रुपया देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी तसेच पणन व नाफेड विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बालाजी पाटील शिंदे यांनी दिला आहे.



