नांदेड| पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर असून, शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी केले.


कंधार येथील पंचायत समिती सभागृहात अति प्रभावित मेघा पाणलोट क्षेत्र संस्थेच्या पुढाकारातून रेशीम शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे होते. तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.


यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, मेघा पाणलोट प्रकल्पाचे समन्वयक दिनेश खडसे, एसबीआय आरसेटीचे आशिष राऊत, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके तसेच मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.



मार्गदर्शन करताना अशोक वडवळे म्हणाले की, रेशीम शेतीमध्ये वारंवार लागवडीचा खर्च करावा लागत नाही. कमी किंवा अधिक पावसाचा परिणामही तुलनेने कमी होतो. सध्या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल सुमारे ५० ते ६० हजार रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

रेशीम शेतीमुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. अळ्यांनी खाल्ल्यानंतर उरलेला तुतीचा पाला सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. या व्यवसायात पती-पत्नी दोघांचाही सहभाग राहू शकतो. त्यामुळे कुटुंबातील समन्वय वाढण्यासोबतच उत्पन्नातही वाढ होऊन सामाजिक आणि आर्थिक विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होते.
“शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती” प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारावी, असे आवाहन वडवळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनीही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश खडसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे, लोभाजी मुळे, सतीश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

