नांदेड | नांदेड शहर ते अर्धापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (ITMS) आणि सीसीटीव्ही पाळत यंत्रणा उभारावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.


या संदर्भात खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अर्धापूर जवळील पार्डी मक्ता टोल प्लाझा ते नांदेड शहरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार या सुमारे ३३ किलोमीटरच्या मार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक गंभीर अपघात घडल्याने जीवितहानीही झाली आहे.

या मार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यानंतर २४ तास वाहतूक नियंत्रण, अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई तसेच अपघात व वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडलेल्या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती देण्यात आली आहे.


