नांदेड | नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाची मुदत संपत असल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९०३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणेकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पंचायत समिती, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच अन्य विभागांतील विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.


विशेषतः हदगाव तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच किनवट, लोहा, नायगाव, धर्माबाद, भोकर, मुखेड आदी तालुक्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे.

निवडणुका होईपर्यंत ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे, विकासकामांवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासकांना जबाबदारी देण्यात येणार आहे. लवकरच याबाबत अधिकृत आदेश निर्गमित होण्याची शक्यता असून जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे.

