नांदेड | नांदेड जिल्हा पाणीदार करण्याच्या दिशेने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्हाभर ‘जलतारा’ ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असलेल्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची कायमस्वरूपी सुविधा मिळावी, यासाठी प्रत्येक शेतात जलसंधारण या उद्देशाने तब्बल १ लाख जलतारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या मोहिमेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जलताराचे महत्त्व, तांत्रिक रचना आणि दीर्घकालीन फायदे समजावून सांगत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवले जाऊन भूजलपातळी वाढीस मोठी चालना मिळणार आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना वर्षातून दोन पिके घेणे शक्य होणार आहे.

मोबाईल अॅपमुळे पारदर्शकता
‘जलतारा’ मोहीम अधिक पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे कामांचे जिओ-फेन्सिंग, नोंदणी, छायाचित्रण व प्रगतीचे थेट निरीक्षण केले जाणार असून, अॅपचे उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.


आतापर्यंतची प्रगती
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३४ हजार ४३४ जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी २८ हजार ८१४ जलतारांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून मागणी होताच कामांना तात्काळ सुरुवात केली जाणार आहे.

हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प
भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशन (BRLF), मनरेगा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘Catch the Rain – Where it falls, When it falls’ या संकल्पनेतून प्रत्येक शेतात पाणी मुरविण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याने केला आहे.

जलताराचे स्वरूप व आर्थिक लाभ
प्रत्येक एक एकर क्षेत्रात ५ फूट रुंद, ५ फूट लांब व ६ फूट खोल खड्डा खोदून जलतारा तयार करण्यात येतो. एका जलतारामध्ये सुमारे ३.६० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मनरेगा अंतर्गत प्रत्येक जलतारासाठी ५,२०० रुपये मजुरी दिली जात असून, एका शेतकऱ्यास कमाल २६ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकते.

नांदेड पाणीदार होण्याच्या दिशेने निर्णायक वाटचाल
‘जलतारा’ मोहिमेमुळे नांदेड जिल्ह्यातील शेती, पाणी व शेतकऱ्यांचे भवितव्य बदलण्याची मोठी आशा निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

