लोहा| “सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,” अशा भावनिक शब्दांत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

लोहा नगर परिषदेच्या प्रांगणात बुधवारी (ता. ४ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजितदादांच्या आठवणी सांगताना आ. चिखलीकर यांचे डोळे पाणावले होते. “दादांचे विचार, कार्यपद्धती आणि शेवटच्या घटकेपर्यंत गरजवंतांसाठी मदतीची भावना आत्मसात करून काम करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

या शोकसभेस आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, कंधार उपविभागीय अधिकारी शरद नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, कृउबा सभापती विक्रांत शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते केरबाजी बिडवई, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वसंतराव पवार, शिवसेनेचे सुरेश पाटील हिलाल, गटनेते भास्कर पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष करिम शेख, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



शोकसभेत कंधार उपविभागीय अधिकारी शरद नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगराध्यक्ष शरद पवार, कृउबा सभापती विक्रांत शिंदे, केरबाजी बिडवई, वसंतराव पवार, भीमराव पाटील शिंदे, पत्रकार हरिहर धुनमळ, शिक्षक नेते विठ्ठल चव्हाण, पत्रकार इमाम लदाफ, माजी नगरसेविका शोभाताई बगडे आदींनी अजितदादांच्या कार्याची आठवण करून देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन नगराध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदक विक्रम कदम यांनी करत अजितदादांच्या जीवनातील अनेक प्रसंग व किस्से उपस्थितांसमोर मांडले.

