भोकर/हिमायतनगर /नांदेड (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सिरंजनी ते पळसपूर या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने, बहुजन समाज पार्टीचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी दि. १९ जानेवारी २०२६, सोमवारपासून भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे.


ग्रामविकास विभागाच्या ‘इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरण योजने’अंतर्गत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असून, प्रत्यक्ष कामात मात्र सबग्रेड तयार न करणे, फॉर्मवर्क व स्टील बारचा वापर टाळणे, योग्य काँक्रिट प्लेसमेंट न करणे, ट्रॉवेलिंग न करणे अशा गंभीर तांत्रिक त्रुटी आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराकडून केवळ दिखाऊ स्वरूपाचे, अत्यंत थातूरमातूर व निकृष्ट काम सुरू असल्याने लाखो रुपयांच्या सार्वजनिक निधीचा अपहार होत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे.


या प्रकरणी दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यकारी अभियंता, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही आजतागायत ना चौकशी, ना कारवाई झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. उलट संबंधित ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने काम उरकण्याचा सपाटा सुरू असून, प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे.



उपोषणकर्त्यांच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या असून, यात रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय व गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी, दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, निकृष्ट कामामुळे झालेल्या नुकसानीची व्याजासह वसुली करावी, संबंधित कनिष्ठ व उपअभियंत्यांचे तात्काळ निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करावी, रस्ता काम नियमांनुसार व दर्जेदार पद्धतीने नव्याने पूर्ण करण्यात यावे अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

“प्रशासनाने साधी चौकशीही न करता ठेकेदाराला अभय दिले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने अमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. उपोषण काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा थेट आणि स्पष्ट इशारा बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी दिला आहे.
प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेवर प्रश्नचिन्ह
लोकांच्या करातून उभारल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामात उघडपणे निकृष्टपणा होत असताना प्रशासनाची उदासीनता ही गंभीर बाब ठरत असून, हा संघर्ष प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून जागे करणार का? असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या उपोषणाला सिरंजणी गावचे माजी सरपंच सह गावातील काही ग्रामपंचायत सदस्य व नागरीकातून पाठिंबा मिळत असलेले उपोषणकर्त्यांन सांगितले आहे.

