कंधार (सचिन मोरे) रानडुकराने दिलेल्या जबर धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कंधार – मुखेड राज्य महामार्गावरील रुई (तालुका कंधार) येथील वळणावर दि ४ जानेवारी रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे देगलूर तालुक्यातील खानापूर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी देगलूर तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी मारोती चांदू गायकवाड वय वर्ष २५ व दीपक मारोती घंटेवाड वय वर्ष २४ हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच २६ सीटी ९८९६ या दुचाकीवरून मुखेड मार्गे कंधारकडे येत असताना ते मुखेड जवळील रुई गावाजवळील वळणावर आले असता सुसाट रानडुकराने या दुचाकीस जबरदस्त धडक दिली. त्यामुळे या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा रुई येथील ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळत आहे.

याबाबतचे वृत्त कंधार पोलीस स्टेशनला कळताच कंधार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे, पेठवडज बीटचे जमादार देविदास गीते, अंकुश पवार, पोकॉ.माणिक आव्हाड यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सदरचे दोन्ही प्रेत उचलून शेव विच्छेदनासाठी पेठवडज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले असल्याची माहिती पेठवडज बीटचे जमादार देविदास गीते यांनी दिली.


सदरील घटनेचे वृत्त लिहीपर्यंत मयत मारोती गायकवाड व दीपक घंटेवाड यांचे नातेवाईक अद्यापही घटनास्थळापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे कंधार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली नसल्याने अद्याप कोणताही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.


