पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी दिलाय भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा – NNL
राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भारतीय जनता पक्षात दहा वर्षापूर्वी प्रवेश केलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी आज पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भारतीय जनता पक्षात दहा वर्षापूर्वी प्रवेश केलेल्या माजीमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे आज पक्ष निरीक्षक रावसाहेब दानवे हे नांदेडात असताना त्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्या केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आपण आपला राजीनामा स्वखुशीने देत आहोत, असे त्यांनी सांगितले. पुढील भूमिकेबाबत बोलताना फक्त वेट अॅण्ड वॉच असे उत्तर त्यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना आज पाठविलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा ८४-हदगाव विधानसभा मतदारसंघाच्या संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्यासोबत गेल्या दहा वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पक्षाची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा आपणास प्रयत्न केला, पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कुठलीही कटुता न ठेवता मी राजीनामा देत आहे तो स्विकारावा, हि नम्र विनंती, असे सूर्यकांता पाटील यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.


नांदेड उत्तरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनाही या पत्राची प्रत त्यांनी पाठविली आहे.विशेष म्हणजे आज पक्षाचे निरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे हे नांदेडात असताना त्या आज पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत उपस्थित नव्हत्या. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर चिखलीकर यांच्या घरी दोन महिन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चव्हाण यांच्या कार्यकाळात नांदेडला एकही उद्योग आला नाही, टेक्सकॉम बंद पडले, अन्य उद्योगही बंद पडले, त्यावेळी त्याला सत्तेतील राजकारणी जबाबदार असल्याचा आरोप करुन बेरोजगारीचा प्रश्न नांदेड जिल्ह्यात बिकट बनलेला आहे. जिल्ह्यात एकही उद्योग गेल्या दहा वर्षात आले नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. नुकत्याच झालेल्या एका माध्यमांच्या संवादात त्यांनी अशोक चव्हाण यांना मिळालेले राज्यसभा सदस्यत्व हि त्यांची लायकी नाही, ते खुप मोठे होते, भाजपामध्ये गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.




