नांदेड l संसाराची आसक्ती सोडून आणि लोभ, मोह, माया आदींचा त्याग करुन भगवान भक्तीमध्ये रममाण होणे हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य परमश्रध्देय श्री युगलशरणजी महाराज अहिल्यानगर यांनी आज येथे केले.


नांदेड येथील स्व.रामनाथ बजाज व स्व.रुख्माबाई बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यनारायण बजाज व बजाज परिवार (किनीवाला) नांदेड यांच्या पुढाकारातून माहेश्वरी समाजाच्या वतीने माहेश्वरी भवन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरु आहे. या यज्ञात दुसरे पुष्प गुंफताना युगलशरणजी महाराज (अहिल्यानगर) यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, माणूस आणि प्राणी यात एक महत्वाचा फरक असा आहे की, माणसाला भक्ती करता येते, भावना समजते, आपल्याला ज्यांनी निर्माण केले, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रवृत्ती माणसात असते. प्राण्यांमध्ये यापैकी काहीही नसते. म्हणूनच मनुष्य जन्म दिल्याबद्दल ईश्वराचे आभार मानून त्याचे सतत स्मरण करणे यासारखा दुसरा धर्म नाही.

मीराबाईच्या भक्तीबद्दल बोलताना ते म्हणाले की, मीरेची भक्ती ही अद्वैत वादाचे उत्तम उदाहरण आहे. मीराबाई भजन म्हणतांना हरीरुपात विलीन होते. मीरा आणि गिरीधर यांच्यामध्ये अंतर उरत नाही, मीरा हिच गिरीधर बनते, असे मीरेच्या भक्तीचे उदात्त रुप आहे. मीरा कुठल्याही शाळेत किंवा महाविद्यालयात गेली नव्हती, परंतु तिच्या गाण्यांवर परदेशामध्ये आणि आपल्या देशातही प्रबंध लिहिले जातात.
ज्ञान आणि माहिती यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे, आपण पुस्तकातून जे मिळवितो ती माहिती असते. आणि ज्ञान आपल्याला गुरुकडून मिळते. नुसत्या माहितीवर जगणारे भक्ती करु शकत नाहीत, ज्यांना ज्ञान आहे, त्यांनाच भक्तीची महती कळते.


भागवत ग्रंथाच्या मंगलाचरणाचे महत्व जाणून घेतले पाहिजे, मंगलाचरण म्हणजे आपले आचरण पवित्र कसे ठेवावे, मंगल कसे राहावे, याचा बोध मंगलाचरणातून होतो. म्हणून मंगलाचरण जाणून घेणे आपले आद्य कर्तव्य आहे.

मनुष्य नेहमी माझे माझे असे करतो, माझे घर, माझी जमीन, माझी संपत्ती, माझे नातेवाईक असा घोषा जन्मभर माणूस लावतो. परंतू हे सर्व करण्यापेक्षा मी हा ईश्वराचा अंश आहे असे मानून जर कालक्रमणा केली आणि भगवान भक्ती केली तरच माणसाचे जीवन सार्थक होईल, असेही महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी धार्मिक पध्दतीने विविध गाणे त्यांनी व त्यांच्या संचाने सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

