हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असून, शेतकऱ्यांच्या शेतातील पिके होत्याचे न्हवते झाली आहेत. दोन दिवस उघडीप मिळाल्यानंतर पुन्हा बुधवारी पाऊस सुरू झाला. गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. आभाळ सतत भरून असल्याने अजून मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.


या अखंड पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीनच्या शेंगा खराब झाल्या असून, कापसाची बोंडे काळवटली आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.


ऑगस्ट महिन्यापासून वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बियाणे, खत, फवारणीवरचे पैसे वाया गेले आहेत. नदी–नाल्याकाठीच्या शेतात पूर वाहून गेला असून, बांध फुटले आहेत. अनेक ठिकाणी शेतं ओस पडली असून, एकही पिक शिल्लक नाही. आता तर संततधार पावसामुळे उमटवली पिकेही नुकसानीत आली आहेत. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीने शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे.



ग्रामीण भागातील अनेक घरांना सततच्या पावसामुळे तडे गेले आहेत. तरीसुद्धा महसूल प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे घरांची डागडुजी करणेही शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून जाहीर केलेली ८५ रुपये गुंठा मदत ही अपुरीच नव्हे तर अपमानास्पद आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून आजघडीला शेतकरी पावसामुळे अक्षरशः डबघाईला आला आहे. काढणीला आलेले सोयाबीन हातचे जाण्याची वेळ आल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.


