देगलूर, गंगाधर मठवाले| महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत राज्यभरातील १३,५०० शासकीय कार्यालयांचा कार्यक्षमतेच्या निकषांवर आढावा घेण्यात आला. या आढाव्यात मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालयाने अव्वल स्थान पटकावले असून, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


हा सन्मान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खासदार अजित गोपछडे, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांसह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मोहिमेतील उपक्रम
या विशेष मोहिमेत कार्यालयीन कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा हे घटक महत्वाचे मानले गेले. देगलूर उपविभागीय कार्यालयाने नागरिकांना वेळेत सेवा पुरवठा, कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करणे, तक्रारींवर जलद कार्यवाही, डिजिटायझेशनचा प्रभावी वापर, कार्यलयीन स्वच्छतेकडे लक्ष, अशा विविध निकषांवर लक्षणीय प्रगती साधली.


प्रशंसा आणि जनतेत कौतुक
उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या कुशल प्रशासन, नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापनामुळे हे यश मिळाल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाने नवे मापदंड प्रस्थापित केले असून, देगलूर उपविभागीय कार्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झळकले आहे. या कामगिरीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी प्रशस्तीपत्र देऊन अनुप पाटील यांचा सन्मान केला. त्यांच्या कार्याचे जनतेत मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


