उमरी/नांदेड| मातंग युवक व त्याच्या प्रेयसीची धिंड काढून क्रूर हत्त्या करणाऱ्या सर्व जातीयवादी गावगुंडांवर गुन्हे दाखल करुन त्या सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केली.


लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित संघर्ष नायक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जन आक्रोश मोर्चा उमरीच्या तहसील कार्यालयावर काढण्यात आला. प्र. तहसीलदार शिरफुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील मौजे बोरजुन्नी येथील मयत दलित मातंग युवक लखन बालाजी भंडारे याचे संजीवनी कमळे या विवाहित मुलीवर प्रेम होते.

यासाठी तो संजीवनीच्या सासरी गोळेगाव येथे भेटण्यास गेला असता सासरच्या लोकांनी बांधून ठेवून संजीवनीच्या माहेरच्या लोकांना बोलावून घेऊन युवक व युवतीचे पाठीमागे हात बांधून बेदम मारहाण करीत गावातून धिंड काढली व दोघांनाही विहिरीत टाकून ठार जीवे मारले. ज्यांनी ज्यांनी मारहाण केली, पाठीमागे हात बांधून धिंड काढली व दोघांनाही विहिरीत ढकलून जीवे मारले त्या सर्व जातीयवादी गावगुंडांवर खून करणे व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी.



सवर्ण जातीच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण का..? केलास म्हणून मौजे गोळेगाव येथे दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलामुलीचे हातपाय बांधुन गावभर धिंड काढण्यात आली होती. त्या ठिकाणचे पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्षांना हा प्रकार माहित असतानाही केवळ उच्च जातीच्या मुलीसोबत प्रेमकरण केले म्हणून हालहाल निर्घृणपणे हत्या केली. यामागे मुलींचे बरेच नातेवाईक सामील आहेत. त्या घटनेच्या अगोदर पासूनच्या कालावधीतील मोबाईल सीडीआर डाटा काढून चौकशी करण्यात यावी, पिडीत कुटुंबाच्या म्हणण्यानुसार पुरवणी तपासणीत उर्वरित संबंधित नराधमांची चौकशी करुन अटक करावी.

हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करुन प्रा. रामचंद्र भरांडे यांनी घटनास्थळी अद्याप भेट न देणाऱ्या पालकमंत्री, खासदार, आमदार व समाज कल्याण अधिकारी यांचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते रावसाहेब पवार, व्ही. जी. डोईवाड, गणपत रेड्डी, लक्ष्मण निदानपुरे, शेषराव रोडे, धोंडोपंत बनसोडे, नागोराव कमलाकर, काॅ. अंबादास भंडारे, गोणारकर आदींनी आपले विचार मांडले.
नारायण ईबितदार, एन. सी. भंडारे, संतोष सुर्यवंशी, देविदास गंगासागरे, कैलाश सुर्यवंशी, साहेबराव गव्हारकर, माधव गायकवाड, राजू गायकवाड आदी पदाधिकारी, तमाम कार्यकर्ते आणि तालुक्यातील असंख्य समाज बांधव, युवक युवती महिला विद्यार्थी विद्यार्थिनी आवर्जून या मोर्चास उपस्थित होते.

