भोकर, साई चौहान| गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भोकर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती आणि घरांचे नुकसान झाले.यात पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे ३७,५०२ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली गेली आहे.



महसूल यंत्रणेकडून पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे.महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून लवकरच पंचनामे पूर्ण केले जातील,अशी माहिती तहसीलदार विनोद गुंडमवाड यांनी दिली.पावसामुळे अनेक भागात रस्ते बंद झाले आहे .काही गावांमध्ये वीज व पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा कामाला लागून नागरिकांशी समन्वय साधून उपाययोजना राबवत आहे. भोकर तालुक्यातील नागरिक सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत.या संकटातून सावरण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.


तालुक्यातील धानोरा, रेणापूर, कोळगाव आणि नांदा( म्हैसा पट्टी)या गावात पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे.पाणी शिरलेल्या घरातील नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.तर सुधा प्रकल्पात एका अनोळखी अंदाजीत ४५वर्षीय व्यक्तीचे मृतदेह आढळल्याची माहिती आहे.सदरील अनोळखी व्यक्तीची ओळख पटली नसून पोलीस तपास करीत आहेत.



