देगलूर/कामारेड्डी,अमृत गोजे, गंगाधर मठवाले| तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरात झालेल्या ढगफुटी पावसामुळे निझामसागर धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून वाझरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.


धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने मेदनकलूर गावात पाणी शिरले. परिणामी प्रशासनाने तात्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. नदीकाठावरील शेळगाव, तमलूर, सागवी, उमरशेवाळा, शेकापूर या गावातील नागरिकांनी विधिवत गणेशपूजन करून रात्रीच गाव सोडून नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे.


पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नरगल इंग्लिश स्कूल (शहापूर), विठ्ठलेश्वर मंगल कार्यालय (शहापूर), सिद्धेश्वर मंगल कार्यालय (देगलूर) यांसह अन्य ५ ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे उभारली आहेत. पूराच्या पाण्यामुळे करडखेड–उदगीर, बळेगाव–देगलूर, भोकसखेडा–नांदेड, लखा–वझरगा, तुपशेळगाव–कुरुडगी, नरगल–उमर सागवी, शहापूर–रामपूर, देगलूर–देगाव आदी रस्ते बंद झाले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे.



दरम्यान, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार कदम आणि पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली असून, नागरिकांनी नदी-नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून दिवस-रात्र लक्ष ठेवून बचावकार्य सुरू आहे.

