उमरखेड/यवतमाळ | हवामान विभाग, नागपूर यांनी दिनांक १८ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांच्या भिंती, टिनपत्रे पडण्याची शक्यता असून विज पडल्याने जीवितहानी होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

काय करावे – काय करू नये याबाबत प्रशासनाचे मार्गदर्शन : पुरसदृश्य भागात जाणे टाळावे. विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, झाडाखाली थांबू नये. नदी-नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकी, चारचाकी अथवा बैलगाडीने प्रवास करू नये. धरण क्षेत्र, नदिकाठ किंवा पर्यटन स्थळी जाऊन सेल्फी काढणे वा व्हिडिओ शूट करणे टाळावे. हवामान अंदाजासाठी ‘सचेत अॅप’ चा वापर करावा.


दरम्यान, ईसापुर, बेंबळा, अधरपुस, अडाण आणि निम्न वर्धा या प्रकल्पांतून विसर्ग सुरू असल्याने नागरिकांनी नदिकाठास जाणे टाळावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. सर्व तहसीलदारांना त्यांचे नियंत्रण कक्ष २४x७ अलर्ट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, आवश्यकतेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दिले आहेत.


