
नांदेड| नांदेड शहरातील गल्लोगल्लीत छा छू करणाऱ्या बुवा बापू अम्मा टम्मांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असल्याने पोलीस यंत्रणा व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.


शहरातील अनेक गल्लीबोळात कांही अडाणचोट महाभागांनी छा छू करीत लोकांना लुटण्यासाठी आपल्या घरात अंधश्रद्धेची दुकानदारी मोठ्या प्रमाणात थाटली आहे. विशेषत: झोपडपट्टी भागात ही दुकानदारी चांगल्या प्रकारे फळत फुलत चालली आहे. रोज सकाळपासून रात्री उशीरा पर्यंत ही दुकानदारी मस्त व बिनधास्त चालू असते. त्यात लाखोंची आर्थिक उलाढाल होत असल्याचे समजते.

वैद्यकीय क्षेत्राचे कसलेही ज्ञान किंवा शिक्षण नसतांना कांही महाभाग विविध आजार दूर करण्यासाठी म्हणून औषधाच्या चिठ्ठ्या लिहून देतात व आपल्या ओळखीच्या विशिष्ट दुकानातूनच ही औषधी खरेदी करा असा आग्रह धरतात. यात महागडी आयुर्वेदिक औषधी अव्वाच्या सव्वा भावाने विकली जातात. त्यातून मिळणाऱ्या भरमसाठ कमिशनने बुवा बापू अम्मा टम्मा हे गब्बर होत चालले आहेत. अशा राखफुक्या बुवा बापूंची संख्या शहरात दिवसागणिक वाढत चालली आहे.


या वाढत्या बुवाबाजीला आळा घालण्यासाठी शासन प्रशासन कांहीही हालचाल करीत नाही. महाराष्ट्र शासनाचा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे पण त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत पोलीस यंत्रणा उदासिन असल्याचे दिसून येते. तसेच नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदाना नंतर त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त सभा संमेलनापुरती मर्यादित झाली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

गोविंद नगर नांदेड येथे मोठ्या प्रमाणात छा छू व बुवाबाजी चालत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांस दिली असता ते म्हणतात की, कुणी तरी तक्रार दिल्याशिवाय आम्ही कांहीही करु शकत नाही. आता ही तक्रार कोण देणार…? दर मंगळवारी ईथे छा छू चा दरबार मोठ्या प्रमाणात भरत असतो.
आपण लुटल्या गेलो आहोत अशी पुराव्यासह तक्रार कुणी दिल्यास आपण पोलिसांच्या सहकार्याने बुवाबाजीला प्रतिबंध घालू शकतो असे समितीच्या प्रतिनिधींचे म्हणणे असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची ? असा प्रश्न निर्माण झाल्याने छा छू ची दुकानदारी गल्लोगल्लीत वाढत चालली आहे. कांही नकली समाजसेवक अशा दुकानदारीला प्रोत्साहन देत असल्याचे समजते. त्यामुळेच “अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बिनघोरी ! गल्लोगल्ली वाढली छा छू ची दुकानदारी !” असे बोलल्या जात आहे.
मुख्य मुद्दे :
-
शहरातील गल्लीबोळात “छा-छू” करणारे बुवा-बापू वाढले – विशेषतः झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर ही दुकानदारी फोफावली आहे.
-
लाखोंची उलाढाल – वैद्यकीय शिक्षण नसतानाही हे लोक लोकांना औषधे लिहून देतात आणि ओळखीच्या दुकानातून महागड्या औषधांची खरेदी करण्यास भाग पाडतात.
-
प्रशासन आणि कायद्याची अंमलबजावणी कमी – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतानाही पोलिस आणि समिती उदासीन आहेत.
-
तक्रारींचा अभाव – समिती सांगते की, लेखी तक्रार आणि पुरावे मिळाल्याशिवाय ते कारवाई करू शकत नाहीत, पण लोक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
-
काही नकली समाजसेवक यांना पाठबळ देतात – त्यामुळेच या बुवाबाजीला अधिक खतपाणी मिळते.



