हिमायतनगर| शहरातील वार्ड क्रमांक 12 मध्ये येणाऱ्या तुकामाँई मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचले असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला तसेच स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.


स्थानिकांचा आरोप आहे की, नगरपंचायत प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर साचलेल्या घाणीच्या पाण्यामुळे डास, माश्या आणि कीटकांची वाढ होत असून, यामुळे परिसरात रोगराई पसरून साथीचे आजार उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


नगरपंचायतीने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता स्वच्छ करून योग्य दुरुस्ती करावी, आणि घाण पाण्याचे दाबके साचणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता पंडित ढोणे यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने केली आहे. अन्यथा आजारपण पसरल्यास यासाठी नगरपंचायत प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.


