
नांदेड| श्रावण महिना सुरू होताच धार्मिक आणि पूजाविधींना विशेष महत्त्व प्राप्त होते आहे. विशेषतः सत्यनारायण पूजेसाठी आवश्यक असलेल्या केळीच्या कंदाला ( banana tubers) ग्रामीण तसेच शहरी भागांतून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.


श्रावणातील प्रत्येक गुरुवार, पौर्णिमा आणि इतर शुभ मुहूर्तांनिमित्त घरोघरी पूजांचे आयोजन केले जाते. सत्यनारायण पूजा, मंगळागौरी, वरमहालक्ष्मी आणि हरतालिका यांसारख्या व्रतांमध्ये केळीचे कंद वापरले जातात. या पूजेच्या मांडवाला सजवण्यासाठी, देवाच्या आसनासाठी तसेच पर्यावरणपूरक पूजेची ओळख म्हणून केळीचे कंद व पाने यांना विशेष स्थान आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील पूजेला पारंपरिक महत्त्व असल्यामुळे प्लास्टिकऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर वाढवला जात आहे. पूजेचे साहित्य पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, मागणीच्या तुलनेत केळीचे कंद कमी असल्याने दरातही वाढ झाली आहे.


शेतकऱ्यांसाठी संधी: या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरत आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये एक कंद ₹५० रुपये तर शहरी भागात केळीच्या कंद ₹१०० पर्यंत विकला जात आहे. काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या किंवा जोडीनं विकल्या जाणाऱ्या कंदांचे दर ₹१५० ते ₹२०० पर्यंत पोहोचले आहेत.



