Samarasata Sahitya : समरसता साहित्य संमेलनाला नांदेडमध्ये भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ

नांदेड, श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्य नगरी | समरसता हा जगण्याचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक असते. समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारे, समाजनिष्ठ साहित्य निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच भारत हे अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकते. यासाठी व्यापक प्रमाणावर समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. समरसता साहित्य संमेलनामधून सामाजिक समस्येसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अनुबंध निर्माण होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी नांदेड येथील विसाव्या समरसता साहित्य संमेलनात व्यक्त केले.


समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने नांदेड येथे विसावे समरसता साहित्य संमेलनाला सकाळी आठ वाजता भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, संमेलनाचे उद्घाटक तथा समरसता साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य प्रा रमेश महाजन, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, बाबा सतनामसिंग, संमेलनाचे पूर्व अध्यक्ष साहित्यिक अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष खासदार डॉ. अजित गोपछडे, कार्यवाह माणिक भोसले, निमंत्रक शिवा कांबळे, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे तसेच ज्ञानभारती विद्यामंदिर चे अध्यक्ष प्रा.बालाजी वाकोडे पाटील, समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे ,कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी दादा इदाते, प्रा रमेश पांडव, पूर्व संमेलन अध्यक्ष प्रा शेषराव मोरे, गोविंद नांदेडे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रसन्ना पाटील यांनी करताना समरसता हा पांडित्याचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे असे सांगितले.
संमेलनाचे कार्यवाह माणिक भोसले यांनी बोलताना नांदेड शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी विभाजन व कार्यकर्त्यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव योगदान दिल्यामुळेच हे भव्य- दिव्य स्वरूपातील साहित्य संमेलन घेणे शक्य झाले असे सांगितले.
संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉ .अजित गोपछडे म्हणाले,” या संमेलनामध्ये बहुविविधतेची लोकसंस्कृती सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. मानवी जीवनामध्ये उदात्त जीवनमूल्ये निर्माण करणारे साहित्य निर्माण व्हावे.


यावेळी बोलताना डॉ रमेश महाजन म्हणाले नांदेडकरांनी समरसता साहित्य संमेलन हे एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे भविष्यातील समरसता साहित्य संमेलने कशी घ्यावीत यासाठीचा माइल स्टोन या संमेलनाने निर्माण केला आहे. समरसतेचा प्रवाह अधिक जोमदार होण्यासाठी या संमेलनातून साहित्यिकांना प्रेरणा मिळेल. समरसतेचा प्रवाह अधिक जोमदार व समाजव्यापी, राष्ट्रव्यापी होईल.

यावेळी बोलताना अक्षयकुमार काळे म्हणाले, ” “साहित्यकृतीच्या सखोल चिकित्सेसाठी व समरसतेच्या विचारांना बांधीलकी असणाऱ्यांना या साहित्य संमेलनातून प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे. भावनिक व मानसिक पातळीवर एकात्मता निर्माण करणे म्हणजे समरसता होय.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गजानन होडे व डॉ. रमा गर्गे यांनी केले. प्रारंभी ज्ञान भारती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. समरसता साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे समरसता साहित्य पत्रिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
तसेच दोन दिवशीय साहित्य संमेलनामध्ये मुलाखती परिसंवाद व गझल मुशायरे, मान्यवर कवींचे कवी संमेलने, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचा समारोप दिनांक 3 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.



