
नांदेड| सामाजिक जाणिवेतून आणि परिवर्तनाच्या ध्येयातून एकत्र आलेल्या संगमेश्वर लांडगे आणि सुमन यांच्या विवाह सोहळ्याने केवळ दोन जीवांचे नव्हे, तर दोन विचारशील प्रवाहांचेही सुंदर संमेलन घडवले. मराठा सेवा संघाच्या विविध चळवळींमध्ये कार्यरत असलेले संगमेश्वर लांडगे हे ‘वीर भगतसिंग परिषद’ चे जिल्हाध्यक्ष ते देशाचे प्रसिद्ध प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत, गेली अनेक वर्षे सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातूनही त्यांनी माध्यम क्षेत्रात अमीट ठसा उठवत, अनेक दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत, प्रज्ञा-प्रतिभावंतांना मंच मिळवून दिला. त्यांच्या समविचारी सहचारिणी सुमन ह्याही सामाजिक कार्यात सक्रिय असून दोघेही वैचारिक आणि परिवर्तनवादी चळवळीत महत्वाचे योगदान देत आहेत.


या वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा नांदेड येथे अत्यंत सुंदर आणि मंगल वातावरणात पार पडला. नुकत्याच मराठा सेवा संघाने ठरवलेल्या आचारसंहितेला प्रमाण मानत कमीतकमी लोकांमध्ये व अधिक खर्चिक बाबी टाळत. या विवाहात शुभमंगलाच्या गजरासोबत समाजप्रती कृतज्ञतेचे सूरही निनादले. या सोहळ्यात ‘सामाजिक बांधिलकी’ ही केवळ बोलण्यात नसून कृतीतूनही व्यक्त होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण घडले. संगमेश्वर लांडगे पाटील आणि सुमन लांडगे पाटील यांच्या वतीने त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित मुलींच्या वसतिगृह, नवामोंढा, नांदेड यासाठी २१,००० रुपयांची रोख देणगी सुपूर्त करण्यात आली.

ही देणगी संगमेश्वर यांच्या आई-वडील, शिवाजीराव लांडगे आणि नागिनबाई लांडगे यांच्या हस्ते मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माजी सनदी अधिकारी, अभिनेते एकनाथ उर्फ अनिल मोरे, स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर, जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त एकनाथ पावडे, से.नि. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक शेरा पाटील, राज्य सहसचिव पंजाबराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष पंडित कदम, पी.टी.ए. चे राज्याचे अध्यक्ष आर. बी. जाधव, शिक्षणतज्ञ भार्गव राजे, प्राचार्य संजय शेळगावकर, प्रशिक्षक संतोष देवराये, सचिव रमेश पवार, ॲड. गणेश तिडके, निवेदक मुरलीधर हंबर्डे, प्रा. कपिल पिचेवार, डॉ सुजित येवलीकर, गणेश शिंदे, नागेश कल्याणकर, साहित्यिक जगन शेळके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. भारती मढवई, जिल्हाध्यक्ष कल्पना चव्हाण आणि इतर पदाधिकारी यांच्याकडे प्रदान करण्यात आली.


विवाहाच्या दिवशी समाजासाठी केलेली ही देणगी म्हणजे नवजीवनाचा आरंभ एका जबाबदारीने झाला, असे म्हणता येईल. यापूर्वीही त्यांनी जन्मदिनाच्या खर्चाचा अपव्यय टाळून अनेक वेळा आर्थिक हातभार लावलेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे वसतिगृह केवळ मेरिटच्या आधारावर प्रवेश देत असून, मुलींसाठी मोफत निवास, जेवण आणि सुरक्षा यांची अत्यंत उत्कृष्ट सोय येथे उपलब्ध आहे. या उपक्रमासाठी समाजातील अनेक संवेदनशील घटकांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.

संगमेश्वर आणि सुमन लांडगे यांचे हे पाऊल केवळ आदर्शवत नसून, नवविवाहित जोडप्यांसाठी एक सामाजिक संदेश घेऊन येते. हा त्यांच्या सामाजिक जाणिवेचा मंगल दिवस ठरला. त्यामळे विवाहात समाजप्रेमाचा अंकुर फुलला. आणि विवाहातून समाजभानाचे सूर निनादले, वैयक्तिक आनंदाच्या क्षणी सामूहिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



