नांदेड| बाभळी बंधाऱ्यातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर विचारविनिमय करण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.

विधानभवनात झालेल्या या भेटीप्रसंगी आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण व भाजपचे नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या सचिवांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत खा. अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काही पर्याय सुचवले. तेलंगणाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे याविषयी दुमत नाही. मात्र एकीकडे तेलंगणातील श्रीराम सागर प्रकल्पातून पाणी समुद्रात वाहून जात असताना महाराष्ट्राला आपल्या हक्काचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे अडवता येत नाही, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.


बाभळी बंधाऱ्याबाबत सूचवण्यात आलेल्या पर्यायांना विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपलब्ध सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २४ जून रोजी बाभळी बंधाऱ्याबाबत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मी स्वतः देखील तेलंगणाच्या जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेत दिली. तेलंगणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तसे न घडल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायालयीन लढ्यासह आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.


नायगावचे आमदार राजेश पवार व देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर बाभळी बंधाऱ्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीच्या मावेजाचा प्रश्न उपस्थित केला. ज्या शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाते, त्यांना सरकारने मोबदला द्यावा, अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली.


