HomeनांदेडElgar protest : चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै रोजी मुंबईत एल्गार...

Elgar protest : चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै रोजी मुंबईत एल्गार आंदोलन

नांदेड| महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीने महा एल्गार आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील कांही सक्रीय सामाजिक संघटनांची एक शिखर संघटना “चर्मकार ऐक्य परिषद” या नावाने स्थापन झाली असून त्या मार्फत आझाद मैदान मुंबई येथे येत्या गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महा एल्गार आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यात आपण सक्रीय सहभागी होत असल्याची माहिती अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिली.

नरसी (ता. नायगांव जि. नांदेड) येथे दिनांक ४ जुलै रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गंगाधर गंगासागरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, “जिसकी जितनी संख्या भारी, उस की उतनी भागीदारी !” हा कांशीराम साहेबांचा फार्मुला असून त्याप्रमाणे जातनिहाय आरक्षण मिळाले पाहिजे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचा सन्मान राज्य सरकारने केला पाहिजे. या बरोबरच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. सध्या फक्त तेरा टक्के आरक्षण मिळते ते किमान सोळा टक्के झाले पाहिजे. या प्रमाणात राजकीय आरक्षण देखिल वाढवून मिळाले पाहिजे. आरक्षण वर्गीकरणाचा लढा एकटा मातंग समाज लढत आहे पण आता ही लढाई चर्मकार समाजही लढणार आहे.

चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्या संत रविदास चर्मोद्योग महामंडळाशी संबंधित असून या महामंडळाचे नाव “गुरु रविदास आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात यावे तसेच महामंडळाच्या कर्जासाठी दोन जामिन देण्याची जाचक अट रद्द करण्यात यावी. सध्या डबघाईस आलेल्या महामंडळास सावरण्यासाठी किमान तीन हजार कोटीचे भागभांडवल देण्यात यावे अशी मागणी महा एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे इंजि. देगलूरकर म्हणाले.

महामंडळास कायमस्वरुपी आएएएस दर्जाचा व्यवस्थापकीय संचालक देण्यात यावा. महामंडळावर अध्यक्ष व लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्यात यावे. राजकीय पुढाऱ्यांना यापासून दूर ठेवण्यात यावे. महामंडळाचे सध्याचे जे कर्मचारी अजिबात कामे करीत नाहीत त्यांना बदलण्यात यावेत. महामंडळातील कंत्राटी कर्मचारी चर्मकार समाजाचेच असावेत असेही इंजि. देगलूरकर म्हणाले.

मागण्यांविषयी सविस्तर बोलतांना इंजि. देगलूरकर पुढे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाकडून पत्र्याचे स्टाॅल त्वरित वाटप करण्यात यावेत. दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहिन चर्मकार समाजाला प्राधान्याने शेत जमिनींचे वाटप करण्यात यावे. विशेष घटक योजनेंतर्गत चर्मकार समाजातील किमान शंभर युवकांना उद्योग उभारणीसाठी बिनव्याजी प्रत्येकी किमान सात कोटी रुपयांचे कर्ज दण्यात यावे. गाव तेथे गुरु रविदास भवन ही योजना राबविण्यात यावी. गुरु रविदासांचा धडा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा.

दहावी उत्तीर्ण प्रत्येक चर्मकार विद्यार्थ्यास शासनाकडून मोफत लॅपटॉप देण्यात यावे. वीर कक्कया आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात गुरु रविदास शासकीय विद्यार्थी वसतीगृह स्थापन करण्यात यावे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार आजवर दाखल सर्व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन चर्मकार समाजातील आपदग्रस्तांना शासनाच्या सर्व सोयी सवलतींचा लाभ देण्यात यावा.

महामंडळामध्ये कंत्राटी कर्मचारी गेली १० ते १५ वर्ष झाली तुटपुंज्या पगारावर सेवा करत आहेत, त्यांना नियमित करण्यात यावे त्यामुळे कामे सुरळीत होतील कारण एका माणसाकडे चार चार जिल्हे आहेत, महामंडळाकडे संगणक नाहीत, पुरेशी स्टेशनरी नाही त्यामुळे कामे करायला अडचणी येतात. या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे शेवटी इंजि. देगलूरकर म्हणाले. या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे यांनी केले. बैठकीला हणमंत गंगासागरे, गंगाराम गंगासागरे, सटवा बरबडे, बाबू गंगासागरे , बालाजी बरबडे, गजानन गंगासागरे, पांडूरंग गंगासागरे आदींची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments