देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील गवंडगावजवळील मुख्य रस्त्यावर असलेला पूल सध्या अक्षरशः धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्याची दयनीय अवस्था उघड झाली आहे. पुलाच्या दुतर्फा वाढलेली झाडाझुडपे, तळातून वाहणाऱ्या पाण्यामुळे झालेली झीज आणि रस्त्यावरचे खड्डे पाहता, मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

हा रस्ता बल्लूर फाटा ते मानूर दरम्यान सुमारे १० ते १५ गावांना जोडतो. या पुलावरून दररोज शेकडो वाहनचालक, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक व महिला यांची ये-जा सुरू असते. मात्र, पुलाची बाजूची संरचना पूर्णपणे कोसळली असून, रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.

प्रशासन झोपेत… दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार का?
ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा वाचूनही कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. “दुर्घटना होईपर्यंतच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.


लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन!
या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देत पूल डागडून दुरुस्त करावा किंवा नवीन पूल उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.


