Friday, May 15

Take special care of animals : बेमोसमी पावसापासून जनावरांची विशेष काळजी घ्या – पशुसंवर्धन विभागाचा सल्ला

नांदेड| राज्यातील अनेक भागांत बेमोसमी पाऊस पडत असल्याने जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांनी दिला आहे.

पावसामुळे दमट हवामान तयार होते, ज्यामुळे गोठ्यातील ओलसरपणा वाढतो. परिणामी, विविध जंतू, विषाणू व बुरशीजन्य आजारांचे प्रमाण वाढते. गोचीड, गोमाशा, डास यांचा त्रासही अधिक होतो. त्यामुळे गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवणे, तसेच जनावरांवर व गोठ्यात कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.

दुधाळ जनावरांमध्ये कासदाह व इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे कास स्वच्छ ठेवणे, पोटॅशियम पर्मॅंगनेटच्या द्रावणाचा वापर करणे आणि वेळेवर लसीकरण करणे गरजेचे आहे. घटसर्प, पोटफुगी, बुळकांडी, सर्दी-पडसे यांसारख्या आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

जनावरांच्या आहारात ओल्या हिरव्या चाऱ्यासोबत सुका चारा, खनिज आणि जीवनसत्त्वयुक्त खाद्य द्यावे. पावसाळ्यात खाद्यावर बुरशी येण्याची शक्यता असते, त्यामुळे साठवणूक काळजीपूर्वक करावी. तसेच पिण्याच्या पाण्याची स्वच्छता राखावी.

नवजात वासरांपासून व्यायल्यानंतरच्या जनावरांपर्यंत पावसाळा संवेदनशील असतो. त्यामुळे गोठ्यातील व्यवस्थापन व पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करणे आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले व पशुधन विकास अधिकारी डॉ. श्यामसुंदर पवळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!