नवीन नांदेड l जगात भारतातील लोकशाही मोठी, सभापती पद हे संवैधानिक असून ते मोठे आहे, पदात गरीमा आहे या पदाचा समाजातील उपेक्षित, वंचित, शोषित, गरीब यांना न्याय देण्यासाठी तसेच समाजाला, पदाला, पक्षाला न्याय देण्याचे काम करण्यासाठी उपयोग करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.

नांदेड शहरातील कौठा भागातील मातोश्री मंगल कार्यालयात त्यांचा धनगर समाजाच्या वतीने 13 एप्रिल रोजी विधान परिषदेचे सभापती झाल्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कार मुर्ती म्हणून ते बोलत होते. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे होते. यावेळी बोलताना सभापती शिंदे म्हणाले की, मी गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेलो व पहिली पायरी चढत असताना भर उन्हाळ्यात पावसास सुरवात झाली यास काय योग म्हणावा हे समजत नाही.

परिस्थितीनुसार पद मिळत गेले. कमी वयात वरिष्ठ सभागृहाचा सभापती होण्याचा मान पक्षांमुळे मिळाला. शंभर वर्षांच्या इतिहासात एका मागासवर्गीय मानसाला या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पद मोठे आहे, नाव मोठे आहे, पदात गरीमा आहे. तसेच जगात सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. सभापती पद हे संवैधानिक आहे. निश्चित या पदाला न्याय देण्याची माझी भूमिका असणार आहे. तशी तळमळ आहे. न्याय देण्याची भुमिका आहे.


सभागृहातील विरोधी पक्षाला मी न्याय देत नाही म्हणून तिसऱ्या आठवड्यात माझ्या विरोधात अविश्वास ठराव आणला. मात्र चौथ्या आठवड्यात विरोधी पक्षाला मी निःपक्ष वाटलो म्हणून अविश्वास प्रस्ताव मागे घेतला. मला अनुभव असून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. या पदाचा उपयोग मी समाजाला, पक्षाला, वंचित, शोषित, उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी उपयोग करणार असल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. विकसित भारताचा नागरीक म्हणून मी काम करणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम पाठबळ आहे. ते मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठाचे नामकरण अहिल्यादेवी होळकर म्हणून करण्यात आले. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर म्हणून नामकरण केले, मुंबई येथील एका कॅन्सर रुग्णालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जिथे येईल त्या ठिकाणी त्या घराण्याचा वंशज म्हणून संवैधानिक मार्गाने काम करण्यास मागे हटणार नाही.
नांदेड येथील गोदावरी पुलावरील वळण पुलाचा संवैधानिक प्रस्ताव पाठवा तातडीने तो प्रस्ताव मंजूर करुन नामकरण करण्यास भाग पाडू असे ते म्हणाले. तसेच गुरुद्वारा प्रशासनाला दरमहा ६० लाख विज बील येत असून त्यांच्या चार एकर जागेवर सोलार पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक ३०१ जयंती प्रयत्न नांदेड येथे होणार असून हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त महाराष्ट्र मंत्रीमंडळाची बैठक चोंडी येथे घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सत्कार केल्याच्या निमित्ताने सर्व समाज व पक्षाचे त्यांनी आभार मानले.
राजकीय आरक्षण देण्यासाठी मागे हटणार नाही – खा अशोकराव चव्हाण
मराठा आणि धनगर समाजाच आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राजकीय इच्छाशक्ती असली की कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सुटणार आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मागे हटणार नाही. धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आरक्षण नसतांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, नगरसेवक, सभापती म्हणून धनगर समाजाला न्याय दिला आहे.
यापुढे देखील धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडच्या विकासात्मक कामात कधीच आडथळा आणला नाही. विकासाबाबत सहकार्याची भुमिका असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व माझी बैठक झाली असून नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडविण्याची तयारी दाखवली आहे. लवकरच एक बैठक बोलावून सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
यावेळी सभापती राम शिंदे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की या पदासाठी मोठ्या उंचीचा माणूस मिळाला आहे.अनुभवातून सर्व प्रश्न लावण्याची ताकत आहे. ते सभागृहातील नव्या व जुन्या सदस्यांचा समन्वय राखून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. विधान परिषदेचे सभापती म्हणून टिळक, गवई, ना. स. फरांदे, शिवाजीराव देशमुख यांच्या सारखे सभापती मी बघितले आहेत. वरिष्ठ सभागृह सोपे नाही. सभागृहातील सदस्य यांचा मर्जी सांभाळावी लागते व सभागृहात सरकारचे काम करावे लागते. या सभागृहाला नाव लौकीक मोठा आहे. व्यक्तीपेक्षा सभागृहांची उंची मोठी असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी आ. बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आ.बाबुराव कदम कोहळीकर, आ.श्रीजया चव्हाण, माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी आमदार रामराम वडकुते, ओमप्रकाश पोकर्णा यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक माजी नगरसेवक राजू गोरे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्ड, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, ॲड किशोर देशमुख, चैतन्य बापू देशमुख, प्रविण साले,संभाजी धुळगंडे, हरीभाऊ शेळके, हाके, प्रविण पाटील चिखलीकर, माजी जि प सदस्य माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, गंगाप्रसाद काकडे, एकनाथ धमने,विजय गंभीरे यांची उपस्थिती होती.
सभापती राम शिंदे यांचा संयोजक राजू गोरे,पांडुरंग काकडे, गंगाप्रसाद काकडे, एकनाथ धमने यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व पदाधिकारी यांनी तालुका निहाय सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .बालाजी हसनाळकर यांनी केले तर आभार शिवाजी गोरे यांनी मानले,या कार्यक्रमास नांदेड हिंगोली, परभणी जिल्ह्यातील समाज बांधव सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

