Young agricultural laborers rush : शेतमजुर युवकांची रोजगारासाठी तेलंगणात धाव….

हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यात कोणताही मोठा उद्योग धंदा नाही म्हणून येथील शेतमजूर युवक तेलंगणाकड कूच करत आहेत. हदगांव तालूका उद्योगविरहित असल्याने सर्वसामान्यना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे रोजगार आहे. नियमित रोजगारा अभावी गरिबी, दारिद्र्य येथे रुजलेलेच आहे. रोजगारासाठी स्थानिक युवक तेलंगणात धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.


शासनाद्वारे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. मात्र, या भागात ही योजना राबविण्यास शासन यंत्रणा कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत प्रशासनाकडे माहिती घेतली असता आम्ही माहिती लोकप्रतिनंदन देत असतो असं सांगून प्रशासन मोकळे होते. परिणामी, हाताला काम नसल्याने रोजगाराच्या शोधार्थ हदगाव तालुक्याचे नागरिकांचे स्थलांतर थांबण्याचे नाव घेत नसल्याचे विदारक चित्र आजही कायम आहे.

तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. या भागात उद्योगधंदे नसल्याने शेतीचे कामे आटोपल्यानंतर विशेषता आदिवासी भागातून रोहयो मजुरांचे तांडे मजुरीच्या शोधात शहर गाठत आहेत. मिळेल ते काम करून हंगामी रोजगार शोधायचा,महिनाभरानंतर पुन्हा आपले गाव गाठून घरी परतायचे. ही स्थिती या भागातील सर्वसामन्य गरीब मजूर व आदिवासींच्या पाचवीलाच पुजलेली आहे.


रोहयो ठरली कुचकामी..
आदिवासी भागातील स्थलांतर थांबविण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजनासारख्या अनेक योजना या भागात राबविल्या आहेत. परंतु शासन, प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे रोजगार मिळणे कठीण होऊन बसले आहे. या भागातील बोटावर मोजण्या इतपत गावात मोजकी कामे देऊन प्रशासकीय यंत्रणा हात झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परिणामी हदगांव तालुका हा नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुना तालुका असून, अनेक दशकांनंतरही या तालुक्याला रोजगारा अभावी दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे. ही वस्तुस्थिती आहे.




