Water fountains disappear : बाटलीबंद पाण्यामुळे पाणपोई गायब… सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज

हदगांव, शेख चांदपाशा| उन्हाळा आला की तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी सामाजिक कार्याची जाण ठेवत सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करीत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये पाण्याचा व्यापार सुरू झाल्याने आणि पाणपोईचा धर्म, जार व बाटलीबंद झाल्याने घेतल्याने पाणपोई गायब होत चालल्याचे चित्र सध्या तरी हदगांव शहरासह तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे रांजण मांडलेल्या पाणपोई कालबाह्य झाल्या आहेत.


तहानलेल्यांना पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, संघटना सामाजिक सेवेची जाण ठेवत वाटसरूंना प्यायचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय कार्यालय, रस्त्यावर, बसस्थानक, आठवडी बाजारात आदी ठिकाणी पाणपोई उभारत होते. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची, गरीब अगतिक व जनतेची तहान होती.

माठाची जागा घेतली जारने…
पाणपोई पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर झाडाखाली सावलीच्या ठिकाणी कुठे रांजण, माठ त्यावर लाकडी झाकणी आणि लाल रंगाचा ओला कपडा झाकलेला असायचा. पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लासही दिसायचे. रांजणांमधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले झालेले पाणी पिले की, तहान भागायची बी आत्मा तृप्त व्हायचा.


परंतु कालांतराने संकल्प बदलले, पाणपोईची जागा थंड पाण्याच्या जारने घेतली. जारमुळे मातीच्या माठांचा, रांजणांचा वापर कमी झाला. कष्टकऱ्यांची तहान भागत होती. गोरगरीब, सामान्यांचे उन्हाळ्यात हाल होत असून, ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही, प्रवासात जार घेणे शक्य नाही, अशा गोरगरीब सामान्यांना पाण्यासाठी व्याकुळ होतांना पाहावयास मिळत आहे.




