Workload of Jaljeevan Mission : लोहा तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा; चौकशी करण्याची जनतेची मागणी

नांदेड/लोहा| लोहा तालुक्यातील जल जिवन मिशन योजने अंतर्गत झालेली कामे, राहिलेल्या त्रुटी पाहिल्यावर ही योजना नेमकी कोणासाठी…? असा प्रश्न निर्माण होत असून, सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावे यासाठी की लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भल्यासाठी असा सवाल जनतेतुन उपस्थित केला जातो आहे. शाश्वत पाणीसाठ्यावरून नळपाणीपुरवठा योजना करून ‘हर घर नल से जल’ अशी जलजीवन मिशन महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आणली आहे. मात्र ही योजना ग्रामीण भागात अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने सदोष कामे केल्याने बारगळली असल्याचे दिसून येत आहेत.


लोहा तालुक्यातील अनेक ठिकाणी कोटींची योजना पुर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र बहुतांश योजनांची कामे निकृष्ठ दर्जाची असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. लोहा तालुक्यातील बेरळी खुर्द गावात राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र असे असतानाही अधिकारी व ठेकेदार यांनी त्याकडे दुर्लक्ष करत काम पुर्ण झाल्याचे दाखवत काही प्रमाणात बिलही अदा केल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रका प्रमाणे कामच झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तालुक्यात या योजनांच्या कामांबाबत स्थानिक जनतेच्या तक्रारी आहेत. या योजनांचे ठेकेदार नेमका कोण..? प्रत्यक्षात काम करतो कोण…? काम पूर्ण होण्याअगोदर पूर्ण बिल कसे काढून दिले जाताहेत असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.


एकूणच लोहा तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हर घल जलचा नारा देत शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी कोट्यावधी रूपये खर्चुन हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनचा नांदेड जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांनी परस्परांशी हातमिळवणी करून या योजनेच्या माध्यमातुन आपले उखळ पांढरे करून घेतले असून, याबाबत आता त्या त्या गाव व वाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या योजनेंतर्गत झालेल्या दर्जाहिन कामांची पोलखोल केली आहे. लोहा तालुक्यात मौजे बेरळी खुर्द गावात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेचे काम निकृष्ठ झाले असून, या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.



प्रत्यक्षत या योजनेचा लाभ जनतेला होण्याऐवजी अधिकारी आणि ठेकेदार यांनीच घेतला असून, त्यामुळे आजघडीला अनेक वाडी तांड्यातील गावकर्यांना पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याचे चित्र आहे. स्थानिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्हयात सुरू असलेल्या अनेक कामांबाबत प्रत्येक गावातील नागरिकांनी आवाज उठवित असून, आता पुन्हा एकदा लोहा तालुक्यातील बेरळी खुर्द गावातील या योजनेत गैरप्रकार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बुध्दे यांनी नांदेड जिल्हयात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत कामाचे ऑडिट करण्याची मागणी करून याची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.




